अहिल्यानगर | जैनवार्ता
अहिल्यानगरच्या रणरागिणींनी आपल्या जिद्द, मेहनत आणि संघभावनेच्या जोरावर राज्यस्तरीय किशोरी गटाच्या कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद मिळवत नगर जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण अहिल्यानगर तसेच आनंद विद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल आनंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव किसन तरटे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अष्टेकर आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शारदा पोखरकर यांनी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले. त्यांनी खेळाडूंच्या चिकाटी, मेहनत आणि संघभावनेचे विशेष कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आनंद विद्यालयाच्या किशोरी गटाने राज्यस्तरीय कबड्डीत उत्कृष्ट खेळ सादर करत “आनंद विद्यालय” हे नाव राज्यभर गाजवले आहे. या विजयानंतर विद्यालयासह संपूर्ण नगर जिल्ह्याचा गौरव वाढला असून विद्यार्थिनींच्या या यशामागे मार्गदर्शक म्हणून श्री. लबडे, श्री. भूतकर, श्री. माने आणि विकास घोलप यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कुशल प्रशिक्षणाखाली खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद संपादन केले.
अहिल्यानगरच्या रणरागिणींच्या या कामगिरीने महिला क्रीडाक्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.



